पुसेसावळी जिल्हा परिषद गटात धनशक्ती तेजस्वी' होणार की जनशक्तीची सरिता वाहणार?

जनता हाच पक्ष आणि जनतेचा पाठिंबा हाच आमचा ए.बी.फॉर्म. - सौ.सरिताताई उदय गुरव.

खटाव  :खटाव तालुक्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटात (म्हासुर्णे-पुसेसावळी भाग) यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापित धनशक्ती आणि घराणेशाहीच्या विरोधात अपक्ष लढाईचा जोरदार प्रयत्न दिसत आहे. पक्षांच्या अधिकृत तिकिटांसाठी 'पॅकेज' आणि 'प्रभाव' यांचे वर्चस्व असताना, सर्वसामान्य जनतेच्या मुद्द्यांवर आधारित अपक्ष उमेदवार मैदानात उतरत आहेत. यामुळे हा गट 'धनशक्ती vs जनशक्ती' चा खरा लढा ठरत आहे.


            पुसेसावळी गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले असून, पक्षांकडून प्रस्थापित नेत्यांच्या जवळच्या प्रस्थापित घराण्यातील महिलांनाच तिकिटे देण्याची चर्चा आहे. भाजप, राष्ट्रवादी अ.प. गट, श.प.गट आणि इतर पक्षांच्या मुलाखतीत 'कार्यकर्त्यांची निष्ठा' ऐवजी 'आर्थिक ताकद' आणि 'खर्च उचलण्याची क्षमता' यावरच भर दिला जात असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे. स्थानिक सूत्रांच्या मते, "पक्ष तिकिटासाठी लाखोंचा 'फंड' अपेक्षित करतात. सामान्य कार्यकर्ता किंवा नवीन चेहरा यांना संधी मिळणे दुर्मीळ आहे."


         या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार म्हणून सौ. सरिता उदय गुरव या अपक्ष अर्ज दाखल करून मैदानात उतरले आहेत. त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून (इंस्टाग्राम, थ्रेड्स) जोरदार प्रचार सुरू केला आहे. "घराणेशाही नाही, तर सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व जिल्हा परिषदेत आणणार... युवा पिढी लढणार, परिवर्तन घडणार... MISSION 2026" असे संदेश व्हायरल होत आहेत. सौ.सरिता गुरव यांनी स्पष्ट केले की, "कोणताही राजकीय वारसा नाही, कोणताही पक्ष नाही, कोणताही नेता किंवा पैसा नाही. त्यामुळे जनता हाच पक्ष आणि जनतेचा पाठिंबा हाच आमचा ए.बी. फॉर्म समजून फक्त गावोगावच्या समस्या सोडवण्यासाठी लढणार."


           प्रस्थापित घराण्यातील उमेदवारांबद्दल स्थानिक मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत आहे. एका स्थानिक शेतकऱ्याने सांगितले, "रस्ते खराब आणि निकृष्ट दर्जाचे, पाणीटंचाई, शेतीसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, उत्तम आरोग्य सुविधा – हे मुद्दे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. प्रस्थापित नेते निवडणुकीत पैसे, मासे आणि दारू-बिर्याणीचा जोर लावतात, पण विकास हा फक्त प्रस्थापित घराण्याचा होत असून जनतेचा होत नाही. अपक्ष उमेदवारांना संधी मिळाली तर खरा बदल होईल."


             २०१७ च्या निवडणुकीतही पुसेसावळी गटात प्रभावशाली नेत्यांचे वर्चस्व होते. २०२२ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक झाली नव्हती, पण आता २०२६ मध्ये प्रस्थापितांच्या विरोधात अपक्षांचा "उदय" हा ग्रामीण महाराष्ट्रातील 'जनशक्ती' चा जागर मानला जात आहे. पुसेसावळी गटातील लढाई आता 'पैसे vs परिवर्तन' अशी झाली आहे.

मतदार कधी नव्हे ते आता प्रश्न विचारत आहेत – पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकणाऱ्याला की, जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होणाऱ्या अपक्षाला मत द्यायचे? हा गट फक्त एका जागेचा लढा नाही, तर ग्रामीण भागातील 'धनशक्तीविरोधातील जनशक्ती'चा प्रतीकात्मक संघर्ष ठरत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला