नावलीतील जमीन खचल्याच्या घटनेने धोक्याची घंटा; महाबळेश्वर तालुक्यातील ६ गावे भूस्खलनाच्या अत्यंत जोखमीत

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात मुसळधार पावसानंतर जमीन खचल्याची ताजी घटना घडताच संपूर्ण तालुक्यातील भूस्खलनाच्या धोक्याबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) तसेच भौगोलिक माहिती प्रणाली, दूरसंवेदन आणि बहु-निकष विश्लेषणावर आधारित अभ्यासामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील सहा गावे भूस्खलनाच्या अत्यंत उच्च जोखमीच्या क्षेत्रात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.


अभ्यासानुसार मेटगुताड, माचुतार, धारदेव, येरणे खुर्द, दूधगाव यांसह सहा गावे अत्यंत संवेदनशील आहेत. तर खिंघर, उंबरी, दानवली, भेकवली, नावली, मोलेश्वर यांसह १८ गावे उच्च जोखमीच्या श्रेणीत आहेत. नावलीतील ताज्या घटनेमुळे या अहवालातील इशारे प्रत्यक्षात किती गंभीर आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात महाबळेश्वर तालुक्यातील तब्बल ४७ गावे उच्च ते अत्यंत उच्च भूस्खलन संवेदनशील असल्याचे नमूद करण्यात आले आहे. डोंगराळ भूप्रदेश, तीव्र उतार, अतिवृष्टी, डोंगर उतारांवरील रस्ते, अनियंत्रित उत्खनन आणि वाढता मानवी हस्तक्षेप ही भूस्खलनाची प्रमुख कारणे असल्याचे अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.


महाबळेश्वर तालुक्यात यापूर्वीही भिलार, कासवंड, उंबरी, भेकवली, मेटगुताड, आंबेनळी घाट आणि पसरणी घाट परिसरात भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेषतः २०२१ मध्ये तालुक्यात १,५०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना नोंदविण्यात आल्या होत्या. त्या वेळी आंबेनळी घाट तब्बल ४५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता.


महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड आणि तापोला ही राज्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळे याच संवेदनशील पट्ट्यात असल्याने दरवर्षी लाखो पर्यटकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाबळेश्वर नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी समन्वयाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.


तज्ज्ञांनी भूस्खलन पूर्वसूचना यंत्रणा अधिक सक्षम करणे, धोकादायक उतारांवर संरक्षक भिंती उभारणे, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे, अतिधोकादायक गावांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करणे तसेच डोंगर कटिंग आणि अनियंत्रित बांधकामांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची शिफारस केली आहे.


धोक्यातील गावे

अत्यंत उच्च जोखीम : मेटगुताड, माचुतार, धारदेव, येरणे खुर्द, दूधगाव यांसह ६ गावे.

उच्च जोखीम : खिंघर, उंबरी, दानवली, भेकवली, नावली, मोलेश्वर यांसह १८ गावे.

ताजी घटना : नावली येथे मुसळधार पावसानंतर जमीन खचली.

इशारा : पावसाचा जोर वाढत असताना भूस्खलनाचा धोका अधिक तीव्र होण्याची शक्यता.

पूर्वसूचना यंत्रणा, उतार संरक्षण, पुनर्वसन आणि नियोजनबद्ध विकास तातडीने राबवावा.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला