औंध पोलिस ठाण्यातील सर्व कारभारच गोपनीय...?

औंध : खटाव तालुक्यातील औंध पोलिस ठाण्यात पारदर्शकतेचा पूर्णतः अभाव निर्माण झाला असून, ‘गोपनीय’ या शब्दाच्या आडोशाने संपूर्ण कारभार खाजगीकरणाच्या दिशेने वळवला जात असल्याची गंभीर चर्चा स्थानिक जनमानसात रंगली आहे. सामान्य नागरिक, पत्रकार आणि काही कर्मचारी यांच्याकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

     औंध पोलिस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, त्यांची प्रगती आणि संबंधित माहिती पत्रकारांना वेळेत नव्हे तर दिलीच जात नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. यापूर्वी अनेक वेळा पत्रकारांनी माहिती मागितली असता, “गोपनीय” किंवा “सुरक्षा कारणास्तव” असे सांगून टाळाटाळ केली जाते. यामुळे गुन्ह्यांची उकल होण्याची प्रक्रिया कितपत पारदर्शक आहे, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

            माहिती अधिकार कायद्यानुसार (RTI) ड्युटी रजिस्टरची मागणी केली असता देखील “गोपनीय” या कारणास्तव नाकारली जाते. एका स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले की, “पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची ड्युटी कशी वाटली जाते, कोणाला किती काम दिले जाते याची माहिती जनतेला जाणून घेण्याचा अधिकार आहे. पण येथे गोपनीयतेची ढाल पुढे करून सर्व काही लपवले जाते.”

हे प्रकरण केवळ माहिती लपवण्यापुरते मर्यादित नाही, तर ठाण्यातील अंतर्गत कारभारात मोठ्या प्रमाणात पक्षपात आणि भेदभाव होत असल्याचेही सूत्रांकडून समजते. हजेरी मेजर स्वतःला अल्प प्रमाणात ड्युटी देत असल्याचे आणि काही ठराविक कर्मचाऱ्यांना सातत्याने टार्गेट करत त्यांना अतिरिक्त कामे लादली जात असल्याचे आरोप आहेत. त्याचवेळी काही निवडक कर्मचाऱ्यांना मुक्ती दिली जाते. यामुळे ठाण्यातील कार्यक्षमता आणि मनोबल दोन्ही प्रभावित होत असल्याचे दिसून येते. यामुळे माहिती अधिकाराचा दुरुपयोग?, अपुरे प्रशिक्षण? की अंतर्गत भ्रष्टाचारावर गोपनीयतेचे पांघरूण? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

              स्थानिक नागरिक म्हणतात, “पोलिस हे जनतेचे सेवक आहेत, गोपनीयतेच्या नावाखाली त्यांचा कारभार जनतेपासून दूर केला जात असेल तर लोकशाहीला धक्का बसतो.” अनेक ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संघटनांनी याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. औंध पोलिस ठाण्याचे हे गोपनीयतेच्या आड सुरू असलेले कारभाराचे धोरण केवळ पत्रकार आणि RTI अर्जदारांपुरते मर्यादित नाही, तर सामान्य गुन्हे दाखल करणाऱ्या नागरिकांनाही माहिती मिळण्यात अडथळे येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत असल्याची भीती व्यक्त केली जात असुन जनमानसात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

        कर्तव्यदक्ष सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक मा. निखिल पिंगळे यांनी या कारभारावर पडदा टाकण्याची माणसिकता असणाऱ्या विद्यमान विभागीय पोलिस अधिकारी, दहिवडी कॅम्प वडूज यांचेवर विश्वास न ठेवता स्वतः चे विश्वसनीय अधिकारी आणि स्वतः याबाबत तत्काळ दखल घेऊन चौकशी करावी आणि औंध पोलिस ठाण्यात पारदर्शक कारभार सुनिश्चित करावा, अशी मागणी स्थानिक स्तरावरून जोर धरत आहे. “गोपनीयता ही काही गोष्टींसाठी आवश्यक असते, पण संपूर्ण ठाण्याचा कारभार गोपनीय ठेवणे हे जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे,” अशी चर्चा जनमानसांत सुरू आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला