आगामी काळात गोरे बंधू दिसणार विधान भवनात?

दहिवडी:सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आक्रमक म्हणून ओळख असणारे व विरोधकांना शिंगावर घेणारे नेते म्हणून प्रसिद्ध असणारे माण खटावचे भाजपा आमदार जयकुमार गोरे व त्यांचे सख्खे बंधू सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक शेखर गोरे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.कार्यकर्त्यांची मजबूत फळी, प्रशासनावर पकड,सखोल अभ्यास व सूक्ष्म नियोजन या कारणांमुळे ते निवडणुकीत यशस्वी होत असतात. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीवर तोंडसुख घेणारे गोरे बंधू राज्यातील बहुतांशी वरिष्ठ नेते मंडळींच्या चर्चेचा विषय ठरतात. सांगली सारख्या शहरातून कुस्तीचे धडे घेत जन्मभूमी माणदेशात येऊन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली.माण मतदारसंघ राष्ट्रवादीचे किंगमेकर असणाऱ्या माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचा बालेकिल्ला समजला जात होता.

    सातारा जिल्ह्याच्या राजकारणात माण तालुक्याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती.राष्ट्रीय काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडल्यानंतर 1999 पासून हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.सदाशिवराव पोळ हे देखील शरद पवार यांचे विश्वासू मानले जायचे.परंतु त्यांच्याच बालेकिल्ल्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जयकुमार गोरे यांनी पहिल्याच प्रयत्नात सुरुंग लावला. नंतर त्यांनी सदाशिवराव पोळ यांचा गड शेखर गोरे यांच्या साथीने उद्धवस्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली.ही वाटचाल तितकी सोपी नव्हती.जवळपास चार ते पाच दशकांपासून पोळ यांनी उभे केलेले साम्राज्य गोरे बंधूंच्या सूक्ष्म नियोजनाने पहिल्याच प्रयत्नात धुळीला मिळवण्यात यश आले आणि जयकुमार गोरे माण खटावचे विधानसभेचे सदस्य झाले. वैचारीक मतभेदामुळे नंतरच्या काळात नाराज झालेल्या शेखर गोरे यांनी जयकुमार गोरेंशी फारकत घेत राष्ट्रीय समाज पक्षातून 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली.या निवडणुकीत शेखर गोरे यांनी जयकुमार गोरे यांना झुंज दिली होती परंतु त्यात शेखर गोरे यांचा पराभव झाला.नंतर त्यांनी आपला मोर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळवत सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक लढवली परंतु 127 अधिकची मते पक्षाकडे असताना देखील 64 मताने त्यांचा पराभव झाला.परंतु संघर्ष रक्तात असलेल्या शेखर गोरे यांनी 2019 ला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयकुमार गोरे व ‘आमचं ठरलयं’चे उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्याविरुद्ध मैत्रीपूर्ण लढतीद्वारे शिवसेनेकडून शड्डू ठोकला.या दोघांनाही घाम फोडलेल्या शेखर गोरे यांनी राजकीय वातावरण गरम ठेवत मातब्बरांच्या विरोधात जिल्हा बँकेला उमेदवारी अर्ज दाखल केला.या अटीतटीच्या लढतीत शेखर गोरे बाजी मारून जिल्हा बँकेचे संचालक झाले.

 नंतरच्या काळात महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी साम-दाम-दंड-भेद वापरून राजकीय ताकद पणाला लावत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आसमान दाखवले आणि शिवसेनेच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटलांसाठी चांगली मते मिळवून दिली व महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेखर गोरे यांना बैठकीचे आमंत्रण देऊन सकारात्मक चर्चा केली.परंतु विधानसभेच्या उमेदवारीसंदर्भात दिलेल्या शब्दात बदल करत फसवणूक केल्याचा आरोप शेखर गोरे यांनी केला.आणि कुळकजाई येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा देत शिवसेनेला अखेरचा राम राम केला. परंतु कोणतीही भूमिका जाहीर न करता त्यांनी कार्यकर्त्यांना दोन दिवसाची वेळ मागितली.दरम्यान त्यांनी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांना विधीमंडळात संधी देण्याचा शब्द दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या साक्षीने जयकुमार गोरे यांना निवडून आणण्याचा निर्णय घेतला.आणि माण खटावचे राजकीय वातावरण बदलले.शेखर गोरे यांनी घेतलेली राजकीय भूमिका गेमचेंजर ठरणार यात कोणती शंका नव्हती. जयकुमार गोरे यांनी जिहे कटापूर,उरमोडी,तारळी,टेंभू यासारख्या पाणी योजनांची केलेली कामे,लाडकी बहीण योजना,माण खटावमधील १५ वर्षांची विकास कामे व उद्दीष्टपुर्ती,गेल्या विधानसभेत ‘आमचं ठरलयं’ टीम मधील डॉ.दिलीपराव येळगावकर,डॉ.संदीप पोळ आणि गेमचेंजर शेखर गोरे यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका.या कारणांमुळे जयकुमार गोरे विजयी होणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिष्याची गरज नव्हती.या सर्व गोष्टी जुळून आल्याने आमदार जयकुमार गोरे जवळपास 50 हजारांच्या मताधिक्यांनी जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या जागा जिंकत विजयी झाले. परंतु शेखर गोरे यांना दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस किती दिवसात सत्यात उतरवणार? आणि गोरे बंधू कधी विधिमंडळ एकत्र दिसणार? याकडे शेखर गोरे यांच्या समर्थकांसह भाजपा कार्यकर्त्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त