राजेश स्वामी यांचे नाव जपण्याचा प्रयत्न स्तुत्य : विद्या पोळ जगताप

भुईंज : समाजाशी घट्ट नातं जपणारे प्रशासकीय अधिकारी राजेश स्वामी यांचे नाव ग्रंथालयाच्या माध्यमातून जपण्याचा उपक्रम अतिशय भारावणारा आहे. या कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीमुळे राजेश स्वामी हे व्यक्‍तिमत्व कसं आणि काय होतं हे लक्षात येतं. त्यांच्यापासून प्रेरणा घेवून भविष्यात भुईंज परिसरातून प्रशासकीय अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा कवियत्री, लेखिका, सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्‍त विद्या पोळ जगताप यांनी भुईंज, ता. वाई येथे बोलताना व्यक्‍त केली. 
राजेश स्वामी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भुईंज ग्रामपंचायतीच्या वाचनालयातील ग्रंथालयाचे ‘आझाद मोफत वाचनालयाचे आय. एफ. एस. राजेश स्वामी ग्रंथालय‘ असे नामकरण विद्या पोळ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार मदनदादा भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्‍वस्त विनोद कुलकर्णी, श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. निलिमा भोसले, उपस्थित होते. 
पोळ जगताप पुढे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना राजेश स्वामी यांच्याबद्दल ऐकलं होतं. स्पर्धा परीक्षेद्वारे भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झालेले  जिल्ह्यातील ते पहिले आहेत. त्यांना भेटण्याचं ठरवलं होतं. पण त्यांच्या अचानक जाण्याने ते राहिलं ते राहिलंच. त्यांच्या जाण्याने समाजाचं किती नुकसान झालं आहे ते समजतंच आणि त्यांच्या पत्नी संजीवनी यांच्या डोळ्यात त्यांचंही किती काय हरवलं आहे ते दिसत आहे. मात्र हा कार्यक्रम संपूर्ण समाजासह त्यांच्या कुटुंबियांना राजेश स्वामी यांच्या कर्तबगारीची किमया कायम असल्याचे जाणवून देईल, त्यांना बळ देईल.
मदनदादा भोसले म्हणाले, राजेशचं अचानक जाणं हे धक्कादायक होतं. मात्र राजेश स्वामी यांच्या स्मृती अखंड जपण्यासाठी ग्रंथालयाला त्यांचे दिलेले नाव अतिशय औचित्यपूर्ण आहे. हे ग्रंथालय पुढील काळात स्पर्धा परीक्षेचे संदर्भ केंद्र म्हणून उदयास यावे यासाठी प्रयत्न करावेत.
हरिष पाटणे म्हणाले, राजेश स्वामी मैत्री जपणारा, आपल्या पदाचा बडेजाव न मिरवता माझ्या कार्यालयात आवर्जून येवून आम्हा मित्रांना भेटणारं व्यक्‍तिमत्व होतं. भविष्यात त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. तशी कर्तबगारी त्यांनी अल्प काळातच बजावली होती. भुईंज गावाने अशा कर्तबगार व्यक्‍तिच्या जपलेल्या स्मृती अभिनंदनीय आहेत.
विनोद कुलकर्णी म्हणाले, साहित्य क्षेत्रात काम करत असताना अशा प्रकारे गर्दीचे कार्यक्रम अपवादानेच पहायला मिळतात. विशेषत: एका ग्रंथालयाच्या नामकरणारासाठी एवढी गर्दी होते हे पुण्या मुंबईतही दिसत नाही. राजेश स्वामी यांचे नाव ग्रंथालयाला देण्यासोबत या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे संदर्भ केंद्र व्हावे ही मदनदादांनी व्यक्‍त केलेली अपेक्षा पुर्णत्वास न्यावी. या ग्रंथालयासोबत साहित्य चळवळीसाठी जे जे सहकार्य लागेल ते ते करु, अशीही ग्वाही त्यांनी यावेळी देत या ग्रंथालयास 100 पुस्तके भेट देणार असल्याचे जाहीर केले.  
यावेळी विक्री कर अधिकारी अमोल गोरे, ग्रंथालयास पुस्तके भेट देणारे गजानन रोकडे, सुनिल लोखंडे, ज्येष्ठ वाचक अर्जुन शिंदे, ग्रांमपंचायतीला जागा देणार्‍या संपूर्ण कांबळे कुटुंबियांच्यावतीने दिवाकर कांबळे, कर सल्लागार स्वप्निल बांदल यांचा सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमास राजेश स्वामी यांचे कुटुंबिय, गावातील विविध संस्थांचे, विविध पक्षांचे, विविध सेवाभावी संस्था, महिला बचत गटाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच सौ. पुष्पा भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव, सदस्य रवी भोसले, प्रविण रोकडे यांनी स्वागत केले. जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला