भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप

सातारा : सातारा येथील भाजप विश्रामगृहात आयोजित पक्ष बैठकीत हातगेघर सोसायटीच्या ठरावावरून माजी भाजप तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे आणि जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषद आमदार धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने भाजपच्या स्थानिक राजकारणातील अंतर्गत संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.


बैठकीदरम्यान हातगेघर सोसायटीचा ठराव बाद झाल्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले. घटनास्थळावरील सूत्रांच्या माहितीनुसार, वसंतराव मानकुमरे यांनी श्रीहरी गोळे यांच्यावर पक्षाशी गद्दारी केल्याचा थेट आरोप केला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक वाढत गेली.


वाद विकोपाला गेल्यानंतर मानकुमरे यांनी गोळे यांना बैठकीबाहेर काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोळे यांना फरफटत बाहेर काढल्याचा आरोपही करण्यात येत असून, या घटनेमुळे बैठकीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. मात्र, या घटनेबाबत संबंधित दोन्ही नेत्यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.


माजी तालुका अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांच्यात पक्षाच्या बैठकीतच झालेल्या या उघड संघर्षामुळे भाजपच्या सातारा जिल्हा संघटनेतील अंतर्गत मतभेदांची चर्चा पुन्हा रंगली आहे. विशेष म्हणजे, आमदार धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने पक्ष नेतृत्व या प्रकरणाकडे कसे पाहते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


हातगेघर सोसायटीचा ठराव नेमका कोणत्या कारणामुळे बाद झाला, त्यामागील प्रक्रिया काय होती आणि त्यावरून पक्षांतर्गत एवढा टोकाचा संघर्ष का निर्माण झाला, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.


एका सोसायटीच्या ठरावाने भाजपच्या बैठकीतच राजकीय ‘ठराव’ फुटल्याचे चित्र निर्माण झाले असून, या घटनेचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला