हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

सत्तेच्या दिशेने झुकणाऱ्यांवर पोस्टमधून घणाघाती टीका; ‘पक्षनिष्ठा की सत्तानिष्ठा?’ असा सवाल

पाचगणी : तालुक्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वातावरण तापवले असून, सत्तेच्या जवळ जाण्यासाठी भूमिका बदलणाऱ्या कथित ‘हुजरेगिरी’वर जोरदार प्रहार करण्यात आला आहे. “काल शशिकांत शिंदे साहेबांकडे हुजरेगिरी करणारेच आज सत्तामंत्र्यांकडे अर्थात बाबाराजेंकडे झुकले आहेत. पक्षनिष्ठा नाही, फक्त सत्तानिष्ठा!” असा थेट आरोप या पोस्टमधून करण्यात आला आहे.


सत्तेची खुर्ची बदलली की निष्ठेची दिशाही बदलते, अशी खोचक टीका करत पोस्टमध्ये काही राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. कालपर्यंत एका नेत्याच्या दरबारात दिसणारे चेहरे आज सत्तेच्या केंद्राभोवती घिरट्या घालत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे “ही विचारांची लढाई आहे की केवळ सत्तेच्या सावलीत स्वतःचे हित साधण्याची धडपड?” असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.


दरम्यान, ‘तुंबडी भरण्याची शर्यत’ सुरू असल्याचा गंभीर आरोपही पोस्टमधून करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करून स्वतःचे हित साधणारे काही जण तालुक्यात खुलेआम फिरत असल्याची टीका करत, अशा प्रवृत्तीला ‘स्वार्थाचे राजकारण’ संबोधण्यात आले आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसल्याने त्यांची बाजूही महत्त्वाची ठरणार आहे.


विशेष म्हणजे, वरुणविरोधाचा आव आणून प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. “निषेधाचा आव आणि सत्तेची ओढ—या विरोधाभासामागचे राजकारण नेमके काय?” असा खोचक सवाल उपस्थित करत, राजकीय भूमिकांच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे.


या पोस्टमध्ये पुढे काही मोजक्या व्यक्तींच्या कथित सत्तानिष्ठ राजकारणामुळे संपूर्ण तालुक्याच्या राजकीय प्रतिष्ठेला धक्का बसत असल्याची टीका करण्यात आली आहे. “दोन-पाच चाट्यांमुळे संपूर्ण तालुक्याला बदनाम होऊ देऊ नका,” असा अप्रत्यक्ष इशाराही देण्यात आला आहे. राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र सत्ता बदलली की निष्ठा बदलणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या विश्वासार्हतेसाठी घातक असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.


सर्वात खोचक इशारा देताना पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज जे बाबाराजेंच्या सत्तेभोवती फिरत आहेत, उद्या सत्ता बदलली तर ते पुन्हा नव्या सत्तेच्या दारात उभे राहतील. त्यामुळे अशा संधीसाधू प्रवृत्तींपासून तालुक्याने ‘अखंड सावधान’ राहण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


एकूणच, या सोशल मीडिया पोस्टमुळे जावळीच्या राजकारणातील निष्ठा, सत्तासमीकरणे आणि संधीसाधूपणा यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या राजकीय रणधुमाळीत संबंधित नेते अथवा कार्यकर्ते यावर काय भूमिका मांडतात, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.


“काल शिंदे, आज बाबाराजे; उद्या कोण?” हा सवाल मात्र या पोस्टने जावळीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनवला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला